॥ श्रीगुरुप्रतिपदा ॥
माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा

श्रीगुरुप्रतिपदा : माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा

दत्तात्रयाचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांचा निजनांदगमन म्हणजे अवतार समाप्तीचा दिवस, माघ कृष्ण प्रतिपदा. ज्याला “श्रीगुरुप्रतिपदा” म्हणू देखील संबोधले जाते. श्री भगवान दत्तात्रेया स्वामी महाराजांचा द्वितीय अवतार श्री नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांनी याच दिवशी शैल्यगमन केले होते. श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून ती दत्त संप्रदाय असेच सर्वच गुरु शिष्य परंपरेत निरनिराळ्या संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.

नमो सदा श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराज ।।

गुरु प्रतिपदा या दिवशी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले निजगमनास जातांना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या.

बहुधान्य संवत्सर माघमास ।कृष्णप्रतिपदा शुभ दिवस । बृहस्पती होता सिंहराशीस । उत्तर दिशो होता सूर्य पैं ।।
शिशिरऋतु कुंभ संक्रमण । लग्नघटिका सुलक्षण । ऐसं शुभमुहूर्ती गुरु आपण । आनंदें प्रयाण करिते जाहले ।।
मध्यें प्रवाहांत पुष्पासनीं ।बैसोनि शिष्यांस संबोधोनी । आमुचा वियोग झाला म्हणौनि । तुम्हीं मनीं खेद न मानावा ।।
त्या गाणगापूरांत । आम्हक असोंच पूर्ववत । भावना धृढ धरा मनांत । तुम्हा दृष्टांत तेथें होईल ।।
आम्ही जातो आनंद स्थानासी । तेथें पाहलों याची खूण तुम्हांसी । फुले येतील जिनसजिनसीं ।।
श्रीगुरूचरित्र अ. ५३ ओवी ३१ ते ३५

दयेची, कृपेचीच जी शुद्ध मूर्ती …धाव घेई हे मन गाणगापुरी…..!!
ध्यान मूलं गुरु मूर्ति, पूजा मूलं गुरु पादुका। मन्त्र मूलं गुरु वाक्यं, मोक्ष मूलं गुरु कृपा।।

आजच्या तिथीला श्रीगुरु नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या ‘निर्गुण पादुका’ स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. येथे यति पूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या ‘विमल पादुका’ स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी, श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या ‘मनोहर पादुका’ स्थापन करून गाणगापुरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या ‘निर्गुण पादुका’ स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत, हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल.

भगवान श्रीगुरु नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांचेच साक्षात् स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात, म्हणून या तीन पादुकांसंदर्भात संक्षेपाने माहिती देत आहोत.

विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत, हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्रीगुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल, दोष नसणा-या पादुका. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वत: श्रीनृसिंहसरस्वती महाराज म्हणतात,

तुम्हां सहित औदुंबरी । आमुच्या पादुका मनोहरी ।
पूजा करिती जे तत्परीं । मनोकामना पुरती जाणा ॥
श्रीगुरुचरित्र १९.८१ ॥

देव वाडी सोडून निघाल्यामुळे दु:खी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की, जे कोणी भक्त तुम्हां योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा, सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल. भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात,

कल्पवृक्षातें पूजोन । यावें आमुचें जेथ स्थान ।
पादुका ठेवितो निर्गुण । पूजा करावी मनोभावें ॥
श्रीगुरुचरित्र ५१.२१ ॥

भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी, असे स्वत: श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी म्हणतात. श्रीक्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत, हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि यांना विशिष्ट असा आकार नाही. म्हणून या पादुकांना ‘निर्गुण पादुका’ म्हणतात. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणा-या पादुका असाच घ्यायला हवा. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात.

श्री गुरु श्रीशैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की ४ प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यानी घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री सायंदेवास मिळाले होते अनेक दत्त अवतारी सत्पुरुषाना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते. आपल्या दर्शनासाठी त्याचा फोटो खाली देत आहोत.

श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची कृपादृष्टी आपल्यावर राहील यात संशय नाही.

नृसिंह सरस्वतींचा जन्म

अकोला जिल्ह्यातील लाड कारंजे या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. गुरुचरित्रात त्यांचे चरित्र वर्णन केलेले आहे. त्यांचे मूळ नाव शालग्राम देव माधव काळे. परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई. वयाच्या सात वर्षांपर्यंत ते बोलत नसत. उपनयन संस्कारावेळी त्यांनी आई अंबाभवानीकडे वेदवाणीचा उच्चार करून भिक्षा मागितली. त्यानंतर ते बोलू लागले.

नृसिंह सरस्वती यांचे अवतारकार्य

वयाच्या आठव्या वर्षी माता-पित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्री केदारला गेले. वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्णसरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्णसरस्वतींनी नरहरीला मठपरंपरेप्रमाणे संन्यासदीक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर ते दक्षिणेस प्रथम कारंजे येथे आले. माता-पित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गांव कृष्णा-पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर गाणगापुरी ते चौवीस वर्षे राहिले. त्या वेळी बेदरचा बादशहा अल्लाउद्दीन (दुसरा) याने त्यांची पूजा केली होती.

पादुकांचे महत्त्व

आजच्या तिथीला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या ‘निर्गुण पादुका’ स्थापन करून अवतारकार्य संपवले होते. नृसिंह सरस्वती महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केले. आपल्या ‘विमल पादुका ‘ स्थापन करून वाडीला गमन केले होते. अश्विन कृष्ण द्वादशी, श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या ‘ मनोहर पादुका’ स्थापन करून गाणगापुरकडे प्रयाण केले. या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून, निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत, याची माहिती कोणालाच नाही. विमल पादुका सोडून बाकी अन्य दोन पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात. औदुंबर येथे नृसिंहसरस्वती महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल, दोष नसणा-या पादुका.

महाराष्ट्रातील दत्तसंप्रदायाचा प्रारंभ नरसिंह सरस्वतींच्या अवतार चरित्रातून झाला असे मानले जाते. नरसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्तसांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली. ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल घनांधकारातून सुरू होती, त्या काळात नृसिंह सरस्वतींचे जीवनकार्य पथप्रदर्शक प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले. महाराष्ट्रभूमीला भक्तीचा, मुक्तीचा मार्ग दाखविणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात ‘युगपुरुष’ म्हणून चिरंतन राहील.

 

गुरूचरित्र – अध्याय एक्कावन्नावा

श्रीगणेशाय नमः ।

नामधारक विनवी सिद्धासी । कथा सांगितली आम्हांसी । म्लेंच्छराजें श्रीगुरुसी । होतें नगरासी नेलें ॥१॥

तेथोन आले गाणगाभुवना । पुढील वर्तल्या निरुपणा । सांगा स्वामी कृपाघना । गुरुचरित्र आम्हांसी ॥२॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा । कथा असे अतिविशेषा । ऐकतां जाती सकळ दोषा । चिंतिलें काम्य पाविजे ॥३॥

राजाची भेट घेऊनि । श्रीगुरु आले गाणगाभुवनीं । योजना करिती आपुल्या मनीं । गुप्त रहावें म्हणोनिया ॥४॥

प्रगट झालों बहुवसी । राजा आला भेटीसी । उपजली भक्ति म्लेंच्छासी । नाना जाती येतील ॥५॥

म्हणोनि आतां गुप्त व्हावें । लोकमतें निघोनि जावें । पर्वतयात्रा म्हणोनि भावें । निघाले श्रीगुरु परियेसीं ॥६॥

गुप्त राहिले गाणगापुरीं । प्रगट दाविलें लोकाचारीं । निघाले स्वामी पर्वतगिरीं । शिष्यांसहित अवधारा ॥७॥

भक्तजन बोळवित । चिंता करीत अत्यंत । श्रीगुरु संबोखिती समस्त । रहावविती अतिप्रीतीनें ॥८॥

दुःख करिती सकळ जन । लागताती श्रीगुरुचरण । स्वामी आम्हांतें सोडून । केवी जातां यतिराया ॥९॥

भक्तजनांची तूं कामधेनु । आम्ही बाळक अज्ञानु । होतासि आम्हां निधानु । सोडोनि जातां श्रीगुरु ॥१०॥

नित्य तुझें करितां दर्शन । दुरितें जाती निरसून । जी जी कामना इच्छी मन । त्वरित पावे स्वामिया ॥११॥

बाळकातें सोडोनि माता । केवी जाय अव्हेरितां । तूं आमुचा मातापिता । नको अव्हेरुं म्हणताती ॥१२॥

ऐकोनि नानापरी विनंति । हांसते झाले श्रीगुरुमूर्ति । संबोखिती अतिप्रीतीं । न करा चिंता म्हणोनि ॥१३॥

आम्ही असतों याचि ग्रामीं । नित्य स्नान अमरजासंगमीं । वसों माध्यान्हीं मठधामीं । गुप्तरुपें अवधारा ॥१४॥

जे भक्त असती माझ्या प्रेमीं । त्यांतें प्रत्यक्ष दिसों आम्ही । लौकिकमतें अविद्याधर्मीं । बोल करितों श्रीशैलयात्रा ॥१५॥

प्रातःस्नान कृष्णातीरीं पंचनदी वृक्ष औदुंबरीं । अनुष्‍ठाना बिंदुक्षेत्रीं । माध्यान्हीं येतों भीमातटीं ॥१६॥

अमरजासंगमीं स्नान करोनि । पूजा घेऊं मठीं निर्गुणीं । चिंता न करा अंतःकरणीं । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥१७॥

ऐसें सांगती समस्तांसी । संदेह न धरावा मानसीं । गाणगाभुवनीं अहर्निशीं । वसों आम्ही त्रिवाचा ॥१८॥

जे जे जन भक्ति करिती । त्यांसी आमुची अतिप्रीति । मनकामना पावती । सिद्धवाक्य असे आमुचें ॥१९॥

अश्वत्थ नव्हे कल्पवृक्ष । संगमीं असे प्रत्यक्ष । तुमच्या मनीं जें अपेक्ष । त्वरित होय पूजितां ॥२०॥

कल्पवृक्षातें पूजोनि । मग यावें आमुचे स्थानीं । पादुका ठेवितों निर्गुणी । पूजा करा मनोभावें ॥२१॥

विघ्नहर चिंतामणी । त्यातें पूजितां एकमनीं । चिंतिलें फळ तत्क्षणीं । लाभे तुम्हां अवधारा ॥२२॥

समस्त विघ्नांचा अंतक । पूजा तुम्हीं विनायक । अष्‍टतीर्थें असती विशेख । आचरावीं मनोभावें ॥२३॥

संतोषकारक आम्हांप्रती । त्रिकाळ करावी आरती । भक्तजन जें इच्छिती । त्वरित होय अवधारा ॥२४॥

ऐसें सांगोनि तयांसी । निघालें स्वामी परियेसीं । भक्त परतोनि मठासी । आले चिंतित पायांतें ॥२५॥

चिंतित निघती मठांत । तेथें दिसती श्रीगुरुनाथ । लोक झाले विस्मित । म्हणती वस्तु त्रैमूर्ति ॥२६॥

यासी म्हणती जे नर । ते पावती यमपूर । सत्य बोलिले निर्धार । न कळे महिमा आम्हांसी ॥२७॥

सवेंचि पाहतां न दिसे कोणी । प्रेमळ भक्त देखती नयनीं । यापरी गौप्यरुप धरोनि । राहिले श्रीगुरु मठांत ॥२८॥

दृष्‍टान्त दाखविला भक्तांसी । पातले आपण श्रीपर्वतासी । पाताळगंगातीरासी । राहिले स्वामी परियेसा ॥२९॥

शिष्यांतें निरोपिती अवधारा । पुष्पांचें आसन त्वरित करा । जाणें असे पैलतीरा । ऐक्य होऊं मल्लिकार्जुनीं ॥३०॥

निरोप देतां श्रीगुरुमूर्ति । आणिलीं पुष्पें शेवंती । कुमुदें कल्हारें मालती । कर्दळीपर्णें वेष्‍टोनि ॥३१॥

आसन केलें अतिविचित्र । घातलें गंगेमध्यें पात्र । शिष्यां सांगती वेगवक्र । जावें तुम्ही गृहासी ॥३२॥

दुःख करीत येत सकळी । यांसी सांगती श्रीगुरु चंद्रमौळी । गाणगाग्रामीं असों जवळी । भाव न धरावा दुजा तुम्ही ॥३३॥

लौकिकमतें आम्ही जातों । ऐसें दृष्‍टान्तीं दिसतों । भक्तजनां घरीं वसतों । निर्धार धरा मानसीं ॥३४॥

ऐसें भक्तां संबोखोनि । उठले श्रीगुरु तेथोनि । पुष्पासनीं बैसोनि । निरोप देती भक्तांसी ॥३५॥

कन्यागतीं बृहस्पति । बहुधान्य संवत्सरी ख्याति । सूर्य चाले उत्तर दिगंतीं । संक्रांति कुंभ परियेसा ॥३६॥

शिशिर ऋतु माघमासीं । असितपक्ष प्रतिपदेसी । शुक्रवारीं पुण्यदिवसीं । श्रीगुरु बैसले निजानंदीं ॥३७॥

श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज मठासी । पावतां खूण तुम्हांसी । प्रसादपुष्पें पाठवितों ॥३८॥

येतील पुष्पें जाती शेवंती । घ्यावा प्रसाद तुम्हीं भक्तीं । पूजा करावी अखंड रीतीं । लक्ष्मी वसों तुम्हां घरीं ॥३९॥

आणिक सांगेन एक खूण । गायनीं करी जो माझे स्मरण । त्याचे घरीं असे जाण । गायनप्रीति आम्हांसी ॥४०॥

नित्य जें जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति । तयांचे घरी अखंडिती । आपण असों अवधारा ॥४१॥

व्याधि न होय त्यांचे घरीं । दरिद्र जाय त्वरित दुरी । पुत्रपौत्र श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥४२॥

ऐकतील चरित्र माझें जरी । वाचतील नर निरंतरी । लक्ष्मी राहे त्यांचे घरीं । संदेह न धरावा मनांत ॥४३॥

ऐसें सांगोनि भक्तांसी । श्रीगुरु जहाले अदृशी । चिंता करिती बहुवशी । अवलोकिती गंगेंत ॥४४॥

ऐशी चिंता करितां थोर । तटाकीं पातले नावेकर । तिहीं सांगितला विचार । श्रीगुरु आम्हीं देखिले ॥४५॥

शिष्यवर्गासी मनोहर । व्यवस्था सांगती नावेकर । होतों आम्ही पैलतीर । तेथें देखिले मुनीश्वर ॥४६॥

संन्यास वेष दंड हातीं । नामें श्रीनृसिंहसरस्वती । निरोप दिधला आम्हांप्रती । तुम्हां सांगा म्हणोनि ॥४७॥

आम्हांस आज्ञापिती मुनि । आपण जातों कर्दळीवनीं । सदा वसों गाणगाभुवनीं । ऐसें सांगा म्हणितलें ॥४८॥

भ्रांतपणें दुःख करितां । आम्हीं देखिलें दृष्‍टान्ता । जात असतां श्रीगुरुनाथा । सुवर्णपादुकां त्यांचे चरणीं ॥४९॥

निरोप सांगितला तुम्हांसी । जावें आपुल्या स्थानासी । सुखी असावें वंशोवंशीं । माझी भक्ति करोनि ॥५०॥

प्रसादपुष्पें आलिया । घ्यावीं शिष्यें काढोनिया । ऐसें आम्हां सांगोनिया । श्रीगुरु गेले अवधारा ॥५१॥

ऐसें सांगती नावेकर । समस्त राहिले स्थिर । हर्षें असती निर्भर । प्रसादपुष्पें पहाती ॥५२॥

इतुकिया अवसरीं । आलीं प्रसादपुष्पें चारी । मुख्य शिष्यें प्रीतिकरीं । काढोनि घेतलीं अवधारा ॥५३॥

नामधारक म्हणे सिद्धासी । मुख्य शिष्य कोण उपदेशीं । विस्तारोनिया आम्हांसी । पुष्पें कोणा लाभलीं ॥५४॥

सिद्ध म्हणे नामधारका । शिष्य बहुत गुरुनायका । असती गाणगापुरीं ऐका । गेले शिष्य आश्रमा ॥५५॥

आश्रम घेती संन्यासी । त्यांसी पाठविलें तीर्थासी । तयांचीं नामें परियेसीं । सांगेन ऐका विस्तारोन ॥५६॥

बाळकृष्णसरस्वती । उपेंद्रमाधवसरस्वती । पाठविते झाले प्रीतीं । आपण राहिले संगमीं ॥५७॥

गृहस्थधर्म शिष्य बहुत । समस्त आपुले घरीं नांदत । त्रिवर्ग आले श्रीपर्वताप्रत । चवथा होतों आपण ॥५८॥

साखरे नाम सायंदेव । कवीश्वर-युग्में पूर्वभाव । नंदी नामें नरहरी देव । पुष्पें घेतलीं चतुर्वर्गी ॥५९॥

गुरुप्रसाद घेऊन । आले शिष्य चौघेजण । तींच पुष्पें मज पूजन । म्हणोनि पुष्पें दाखविती ॥६०॥

ऐसा श्रीगुरुचा महिमा । सांगतसे अनुपमा । थोडें सांगितलें तुम्हां । अपार असे सांगतां ॥६१॥

श्रीगुरुचरित्र कामधेनु । सांगितलें तुज विस्तारोनु । दुःख दरिद्र गेलें पळोनु । ऐसें जाण निर्धारीं ॥६२॥

ऐसें श्रीगुरुचरित्र । श्रवणीं कीर्तनी अतिपवित्र । सुखें नांदती पुत्रपौत्र । लक्ष्मीवंत होती जाण ॥६३॥

धर्म अर्थ काम मोक्ष । तयांसी लाभे प्रत्यक्ष । महा आनंद उभयपक्ष । पुस्तक लिहितां सर्वसिद्धि ॥६४॥

ऐसें सिद्धें सांगितलें । नामधारक संतोषले । सकळाभीष्‍ट लाधलें । तात्काळिक अवधारा ॥६५॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । श्रीगुरुचरित्र अतिमनोहर । ऐकतां पावती पैल पार । संसारसागरा तरोनिया ॥६६॥

श्रीगुरुचरित्र ऐकतां । सकळाभीष्‍टें तत्त्वतां । लाधती म्हणोनि समस्तां । ऐका म्हणे नामधारक ॥६७॥

अमृताची असे माथणी । स्वीकारितां भाविक जनीं । धर्मार्थ काम मोक्ष साधनीं । हेचि कथा ऐकावी ॥६८॥

पुत्रपौत्रां ज्यासी चाड । त्यासी हे कथा असे गोड । राहे लक्ष्मी स्थिर अखंड । श्रवणमात्रें घरीं नांदे ॥६९॥

चतुर्विध पुरुषार्थ । लाधती श्रवणे परमार्थ । श्रीनृसिंहसरस्वती गुरुनाथ । रक्षी त्यांचे वंशोवंशीं ॥७०॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । श्रोतयांसी करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकळाभीष्‍टें साधती ॥७१॥

मुख्य भाव कारण । प्रेमें करितां श्रवण पठण । निजध्यास आणि मनन । प्रेमें करोनि साधिजे ॥७२॥

श्रीनृसिंहसरस्वती शंकर । त्याचे चरणीं अर्पण साग्र । त्याचेचि प्रसादें समग्र । समस्त प्रजा सुखी असती ॥७३॥

ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानीं । शुद्ध वस्त्रीं शुद्ध मनीं । नित्य पूजा करोनि । ग्रंथ गृहामाजीं ठेवावा ॥७४॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्धनामधारकसंवाद अमृत । गुरुसमाधि नाम विख्यात । एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥७५॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुसमाधिगमनं नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥५१॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

ओवीसंख्या ७५

1 thought on “गुरुप्रतिपदा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top